छञपती संभाजीनगर, ता.30 - मराठवाड्यात अतिवृष्टी व पुरामुळे 32 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 1500 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीसाठीचा हा निधी असून निधीचे डीबीटी प्रणालीद्वारे बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.अशी माहिती विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बाधित शेतकऱ्यांनी ई - केवायसी करून घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले.
मराठवाडा विभागात अतिवृष्टी व पुरामुळे 31 लाख 98 हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली असून पंचनाम्याचे जवळपास 81 टक्के काम पूर्ण झाले आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत पंचनाम्याचे काम पूर्ण करा. असे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहे.
पूरपरिस्थितीमुळे सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. गहू आणि तांदूळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.पण तूरडाळ उपलब्ध नसल्याने त्याची खरेदी करावी लागणार आहे.जर स्थानिक पातळीवर तूरडाळ खरेदीची परवानगी मिळाली तर लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले
0 Comments