news today, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने होणार - निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

निवडणुकीत व्हीव्हीं पॅटचा वापर नाही, 1 जुलै 2025 ची मतदारयादी ग्राह्य - निवडणूक आयोगाची माहिती


नाशिक ता.05 -  चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने होणार आहेत. कोणती निवडणूक आधी आणि कोणती नंतर हे अद्याप निश्चित नाही.या निवडणुकांमध्ये व्हीव्ही पॅट यंत्राचा वापर केला जाणार नसल्याची माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. 
मंगळवारी (ता. 05) येथील विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूकपूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार संख्या, मतदान केंद्रे, सोयी सुविधा, आवश्यक मनुष्यबळ, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आदींची संपूर्ण तयारी आणि पूर्वनियोजन याबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आढावा घेतला.

यानंतर प्रसारमाध्यमांशी निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी संवाद साधला. राज्यातील महानगपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका एकाचवेळी घेणे शक्य नसल्याचे त्यांनी सूचित केले. ओबीसी आरक्षण सोडत पद्धतीने काढली जाईल. या निवडणुकीत व्हीव्हीं पॅट यंत्राचा वापर केला जाणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 नुसार जी मतदार यादी आहे ती ग्राह्य धरण्यात येणार येईल. महानगरपालिकेच्या एकाच प्रभागात मतदाराला उमेदवारांना चार मतदान करायचे असते यात बराच वेळ जाऊ शकतो यामुळे मतदारांच्या रांगा नियंत्रित करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. कोणतेही राज्य निवडणूक आयोग व्हीव्ही पॅट वापरत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या निवडणुकांसाठी मध्यप्रदेश निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्रे आणली जाणार आहेत.अशी माहिती त्यांनी दिली.



Post a Comment

0 Comments