छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (जिमाका) - मतदार याद्यांसंदर्भात नागरिकांच्या असणाऱ्या आक्षेप व तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
स्थानिक स्वरांज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दि. १ जुलै २०२५ रोजी अंतिम केलेल्या मतदार याद्यांबाबत काही ठिकाणी आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यात दुबार नावे असणे ही तक्रार प्रामुख्याने आहे.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, डॉ. सुचिता शिंदे, एकनाथ बंगाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, प्रत्येक मतदार यादीची बुथनिहाय पडताळणी करावी. आपल्यामतदार याद्या ह्या बिनचुक असतील याबाबत खबरदारी घ्यावी. मतदार याद्यांसंदर्भात आलेल्या प्रत्येक तक्रारीचे निराकरण करण्यात यावे. तक्रारदारांचे शंकासमाधान करण्यात यावे.मतदार याद्यांवर घेतलेल्या आक्षेपांबाबत निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
दुबार मतदार नावनोंदणी आक्षेपांसंदर्भात कार्यपद्धती
जिल्ह्यात प्रामुख्याने दुबार मतदार नोंदणी संदर्भात आक्षेप असून याबाबत अवलंबावयाची कार्यपद्धती राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यानुसार, दुबार नावांसंदर्भात प्राथमिक चौकशी करावी. दुबार नावे एकाच व्यक्तीची आहेत हे लक्षात आल्यानंतर तो मतदार एकच आहे याबाबत खात्री करावी. एकापेक्षा जास्त प्रभागात एकाच मतदाराचे नाव आले असल्यास अशा मतदारांच्या नावांची यादी सुचना फलकावर, वेबसाईटवर प्रसिद्ध करावी. असे मतदार हे कोणत्या प्रभागात मतदान करणार आहेत याबाबत लेखी अर्ज करण्याचे त्यांना आवाहन करावे. जे मतदार या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोणत्या प्रभागात मतदान करणार आहेत हे कळवतील त्यानुसार अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादीत नोंद घ्यावी. मतदारांनी आवाहनास प्रतिसाद न दिल्यास मतदार यादीतील अशा सर्व नावांसमोर दुबार नाव अशी नोंद करावी. असे मतदार मतदानासाठी आल्यास केंद्रांध्यक्षांनी त्यांच्या ओळखपत्रावरुन त्यांच्या खरेपणाविषयी खातरजमा करावी व खात्री पटल्यानंतरच मतदान करु द्यावे.
0 Comments