लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
वैजापूर, ता.28 -- लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी अधिकाधिक लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज वैजापूर येथे केले.
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वैजापूर येथे आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी भागवत विघोत, तहसिलदार सुनिल सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक तावीजवाले तसेच अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग हा लोकशाही व्यवस्था मजबूत करतो. महिला मतदारांमध्येही जागृती करुन त्यांनाही मतदानासाठी आवाहन करणे आवश्यक आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शकपणे राबवावी,असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी मतदान पूर्वतयारीचा आढावा घेतला. मतदान यंत्रे, स्ट्रॉंग रुम, मनुष्यबळ व्यवस्थापन, कायदा सुव्यवस्था आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. शाहीर अशोक बागुल आणि त्यांच्या पथकाने मतदान जनजागृतीपर पोवाडा सादर केला. जिल्हाधिकारी स्वामी यांनी ‘मी मतदान करणारच’ या स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करुन आपला सहभाग दर्शविला.
0 Comments