वैजापूर, ता.17 - उसाच्या भावावरून वैजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी तालुक्यातील महालगाव येथील पंचगंगा साखर कारखान्याने ऊसाला प्रति टन 3100 रुपये भाव द्यावा अशी मागणी केली आहे. पंचगंगा साखर कारखान्याने आतापर्यंत केवळ 2850 रुपये प्रति टन भाव दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तालुक्यातील नागमठाण येथे बैठक घेऊन याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारी महालगाव येथील पंचगंगा साखर कारखान्यावर कारखान्याचे सर्वेसर्वा प्रभाकर शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.
दरम्यान, कारखान्याची बदनामी केल्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला मानहानीची नोटीस कारखान्याने पाठवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हे ऊस प्रकरण चांगलेच पेटण्याची चिन्हे आहेत.
एक वर्षांपूर्वी वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे पंचगंगा साखर कारखाना मान्यवरांच्या उपस्थितीत सुरु झाला. त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी तालुक्यातील ऊस उत्पादकांना इतर कारखान्यापेक्षा शंभर रुपये भाव अधिक देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कमी भाव मिळाल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. दहा टक्के उतारा असल्यास किमान किफायतशीर भावाच्या हिशोबाने शेतकऱ्यांना प्रति टन तीन हजार पाचशे रुपये भाव मिळायला हवा. मात्र ठराविक कारखानेच हा भाव शेतकऱ्यांना देतात. अशा परिस्थितीत पंचगंगाने तीन हजार शंभर रुपये भाव द्यावा अशी आमची मागणी आहे अशी माहिती शेतकऱ्याने दिली. या शिवाय कारखान्याने शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे ऊस बेणे, कंपोस्ट खत देऊन सहकार्य करावे जेणे करून ऊस उत्पादक वं कारखान्याचे नाते अधिक दृढ होईल अशीअपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. आमचा कारखान्याला विरोध नाही, पण कारखान्याने किमान तीन हजार शंभर रुपये भाव देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी एवढी माफक अपेक्षा असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
0 Comments