मुंबई, ता.14 - राज्यातील 66 नगरसेवकांच्या बिनविरोध निवडी विरोधातील मनसेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असून या निर्णयामुळे नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मनसेच्या अविनाश जाधव यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. उमेदवार बिनविरोध निवडून आला असला तरी मतदारांसाठी नोटाचा पर्याय असावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
ही याचिका इतर प्रलंबित याचिकांसारखीच, असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, सुनावणीसाठी याचिका पुकारण्यात आल्यानंतर ऑनलाईन उपस्थित असलेले असीम सरोदे यांनी, ही याचिका तत्सम नसून निवडणुकीशी संबंधित असल्याचे सांगितले. त्यावर मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए.अंखड यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. चुकीचे विधान केल्याबद्दल आम्ही तुमच्यावर दंड लावणार आहोत आणि याचिका फेटाळणार आहोत असे हायकोर्टाकडून सांगण्यात आले. एखाद्या पक्षकारासाठी अशी चुकीची माहिती देण्यामागे तुमची घाई किंवा भीती काय होती ? असा प्रश्नही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. शेवटी न्यायालयाने दंड न आकारता ही याचिका फेटाळून लावली आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये मतदान होण्यापूर्वीच 66 उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणुका बिनविरोध करण्यात भाजपाने आघाडी घेतली असून, भाजपचे 44 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यापाठोपाठ निवडणुका बिनविरोध करण्यात शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे 19 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. कल्याण-डोंबिवलीत भाजपचे सर्वाधिक 14 उमेदवार तर शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर मालेगावमधून इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे.
0 Comments