राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देताना भाजपचे डॉ.दिनेश परदेशी, अविनाश पाटील गलांडे ,ज्ञानेश्वर जगताप व कल्याण पाटील दांगोडे ...
वैजापूर, ता.19 - तालुक्यातील श्री रामकृष्ण-गोदावरी उपसा जलसिंचन योजना शासनाने ताब्यात घेऊन सुरु करणेबाबत भाजपा नेते व जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शुक्रवारी (ता.19) छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतली व निवेदन दिले. यावर विखे यांनी प्रस्ताव तपासून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
वैजापूर तालुक्यातील 14 गावासाठी रामकृष्ण-गोदावरी उपसा जलसिंचन संस्था कार्यान्वित करण्यात आली. या संस्थेवर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. त्यापैकी 36 कोटी 37 लाख रुपये कर्ज माफी राज्यातील फडणवीस सरकारने व 145 कोटी रुपये व्याज माफी छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी माफी केलेली आहे. शेतकऱ्यांचे सातबारे त्यामुळे कोरे झाले असून ही योजना सध्या वापराविना पडून आहे. योजनेची मालकी कोणाची आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. म्हणून जलसंपदा विभागाने या योजनेचा तत्काळ सर्व्हे करून योजना कार्यान्वित करून 14 गावातील तलाव हे भरण्याचे नियोजन वेळोवेळी केले तर या भागातील पिण्याच्या पाण्याचा व काही अंशी शेतीच्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी दूर होईल. योजना राज्य सरकारने ताब्यात घेऊन चालू करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश गलांडे, संचालक कल्याण दांगोडे, ज्ञानेश्वर जगताप यांनी केली.
0 Comments